Contact Us

Bungalow No 7, Suriya Nagri Society,
House No: 933, Kankradi Road,
Dahanu Road – 401602

contact@aroehan.org

+91 25202 99245

Tag: shocking news

AROEHAN

एका लग्नामागचे क्रौर्य …  !

खरं तर लग्न हा मनुष्याच्या  आयुष्यातील एक आनंददायी ठेवा म्हटला जातो. काही जण त्याला पवित्र बंधन असेही म्हणतात. पण मी आज ज्या लग्नाची सत्यकथा  सांगणार आहे ती संवेदनशील माणसाची मती गुंग करणारी  आहे, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आणि समाजातील मुली-महिलांच्या (विशेषत: आदिवासी) गरिबी व असाहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे  शोषण आणि दमन करण्याच्या विकृत मानसिकतेचा आरसा दाखवणारी आहे.

ही गोष्ट आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासीबहुल तालुक्याच्या कातकरी वाडीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची. तालुक्याच्या ठिकाणापासून ५ ते ६ कि.मी. अंतरावर पोशेरा हे गाव वसलेले आहे. या गावाच्या पूर्वेला साधारण ६००-७०० लोकसंख्या असणारी कातकरी वाडी आहे. या ठिकाणी  अबला नावाच्या (नाव काल्पनिक आहे) एका अल्पवयीन मुलीचे पैशाच्या मोबदल्यात जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला असून त्यासाठी मुलीवर दबाव टाकला जात असल्याची  माहिती ‘आरोहन’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीला मिळाली. तिने संस्थेच्या वरिष्ठांना येऊन ही माहिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून  संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब  ते गाव गाठले. आणि पीडित मुलीच्या वडिलांची, काकीची व मुलीची भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेत असताना जे वास्तव समोर आले ते अंगावर काटा आणणारे होते.

कातकरी येथील परिस्थितीची तपासणी करताना आरोहण

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव-नगर देवळा येथील एका अनोळखी व्यक्तीने आदिवासी समाजातीलच एका मध्यस्थ दलालाला  हाताशी धरून मुलीच्या व तिच्या वडिलांच्या गरिबीचा, अज्ञानाचा व असाहाय्यतेचा फायदा घेऊन मुलीस १५ हजार रुपये  देऊन व वडिलांस ५० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असल्याची माहिती मुलीच्या  काकीने दिली. (हे प्रतिज्ञापत्र उपलब्ध होऊ शकले नाही, त्याची प्रत मुलीच्या नातेवाईकांकडे देण्यात आली नाही.) मुलीच्या आईचे  मुलगी लहान असतानाच निधन झाले असल्याने लहानपणापासून काकीनेच तिचा सांभाळ केला. वडिलांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने व व्यसन असल्याने मुलीकडे त्याचे लक्ष नव्हते. ५० हजाराच्या आमिषाने सुरुवातीला त्यानेही या लग्नास संमती दिली होती.  परंतु लग्नासाठी आवश्यक असणारे कोणतेही रीतीरिवाज पाळले गेले नव्हते. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला नव्हता. मुलीला व वडिलांना प्रभावित करण्यासाठी, नवरा मुलगा या मुलीच्या फोनवर बस्ता बांधल्याचे फोटो (भारी कपडे व साड्या, इ.) पाठवून लवकरात लवकर लग्न करण्याबाबत दबाव वाढवत होता. एक दोन वेळा मुलाशी फोनवरून संभाषणही करण्यात आले. हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने  मुलीच्या पाहण्याचा रीतसर कार्यक्रम करावा असे नातेवाईकांनी मध्यस्थाला सांगितले. परंतु  मध्यस्थाने फक्त वडिलांना ‘मुलाच्या घरी जाऊन कुंकू लावण्याचा कार्यक्रम करू’ असे सांगितले. वडिलांनी मुलीशिवाय असा कार्यक्रम कसा करता येईल? असा प्रश्न उपस्थित केला. अखेर वडिलांच्या आग्रहाखातर, हो -ना करत मुलगी व वडील मुलाच्या घरी कुंकू लावण्याच्या कार्यक्रमासाठी गेले. तेथेही कार्यक्रमासाठी  कोणी जबाबदार माणसे नव्हती. या सगळ्या गडबडीमुळे मुलीच्या काकीला संशय आला. तिने तिच्या वडिलांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली. अखेर विचारांती त्यांनी हे लग्न करण्यास नकार दिला.  

 हा नकार मिळाल्यानंतर मध्यस्थ दलालाने मुलीकडे १५ हजार रुपये परत करण्याचा तगादा लावला. तिच्यावर दबाव टाकू लागला. त्यामुळे मुलगी, तिचे वडील व काकी हवालदिल झाले होते. कारण पैसे तर खर्च झाले होते. आता पैसे आणायचे कुठून? या विवंचनेत ते पडले होते. अशा परिस्थितीत अडकलेल्या या कुटुंबाला ‘आरोहन’ने मानसिक धीर दिला. पैसे परत करण्याची काही गरज नाही असे सांगून ‘आरोहन’ तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. दरम्यानच्या काळात तो मध्यस्थही तेथे आला. त्याच्यावर आरोहनच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबती करून तो करीत असलेले काम किती समाजविघातक व बेकायदेशीर आहे, याची कडक समज दिली व यापुढे मुलीकडे किंवा तिच्या नातेवाईकांकडे परत पैशांची मागणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. मध्यस्थाने पुन्हा पैसे मागणार नसल्याचे सर्वांसमोर मान्य केले. येथे एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा कट उधळला गेला. तात्पुरता हा प्रश्न मिटल्याचे समाधान वाटले. परंतु वरवर दिसणारी लग्नाची ही घटना फक्त लाग्नापुरती मर्यादित नसून यामागे लग्नाच्या नावाखाली आदिवासी मुलींची विक्री / तस्करी करणारी टोळी किंवा व्यक्ती कार्यरत असावी असा संशय येण्यास पुरेसा वाव असल्याचे लक्षात आले. कारण अशाप्रकारच्या अनेक घटना या भागात घडल्या असल्याचे विविध लोकांकडून कळले.   

अधिक माहिती घेतली असता दरवर्षी जव्हार-मोखाडा या भागातील अनेक आदिवासी मुली बेपत्ता  झाल्याची दबक्या आवाजातील चर्चा ऐकावयास मिळाली. या घटना पुढे येत नाहीत कारण या भागातील आदिवासींची अतिशय दारुण आर्थिक परिस्थिती, अज्ञान व व्यसनाधीनता असल्याने मुलींचे पालक थोड्या पैशाच्या अमिषाला  बळी पडून अशा प्रकारचे व्यवहार करीत असल्याचे बोलले जाते. प्रकरण उघडकीस आले किंवा कोणी विरोध केला तर पालक  संबंधित गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहतात. याहूनही सुन्न करणारी  बाब म्हणजे, अशाप्रकारच्या असाहाय्य व गरीब मुलींना शोधून त्यांच्या लग्नाचे सौदे करणारे मध्यस्थ दलाल हे इथल्याच समाजातील व परिसरातील आहेत. अर्थात त्यांचीही गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांचाही अशा कामासाठी वापर करून घेतला जातो हे त्यांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे कोणी तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परिणामी या भयाण वास्तवाची जाहीर वाच्यता किंवा नोंद कुठेही होत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासींना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलींचे असे सौदे करावे लागत असतील आणि उमलण्याआधीच अशा कळ्या कुस्करल्या जात असतील तर आपण कोणत्या स्वातंत्र्यात राहतो ? याचा अंतर्मुख होवून विचार करण्याची व  शीघ्र कृती करण्याची वेळ आली आहे असे प्रकर्षाने वाटते.    

-प्रदीप खैरकर
आरोहन